तेरणा काठ वृत्तसेवा ---- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत गाव क्षयरोगमुक्त करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येरमाळा ग्रामपंचायतीचा ‘टी.बी.मुक्त पंचायत’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. कळंब पंचायत समितीच्या वतीने हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
येरमाळा ग्रामपंचायतीने क्षयरोगमुक्त गाव करण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.पंचायत समितीच्या सभागृहात तालुका आरोग्य विभागाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या मूर्ती व प्रशस्तीपत्र देऊन येरमाळा ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सोपान अकेले , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोवर्धन महींदरकर,जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने,क्षयरोग पर्यवेक्षक सुरेश यादव,संतोष बनसोडे,जि.प. सदस्य उद्धव शिंतोळे,पं.स.सदस्य राणी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
येरमाळा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रिया विशाल बारकुल,तसेच आशा स्वयंसेविका आशा जावळे यांनी सभापती राजश्री वरपे, आरोग्य अधिकारी,पदाधिकारी, यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे यावेळी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments